Breaking News Latest updates loading...

शाळांचे मनमानी पद्धतीने आरटीई प्रवेश

मुदत संपत आली असल्यामुळे पालकांचे टेन्शन वाढले

मुंबई: खाजगी शाळांमधील २५ टक्के जागांवरील राखीव प्रवेश चालू असून आज त्याची मुदत संपत आहे. अनेक ठिकाणी पालकांना प्रवेश मिळाला आहे, त्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे परंतु शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत नाही अशा तक्रारी येत आहेत. संदर्भात 'आप पालक युनियन' कडे अनेक तक्रारी आल्या असून मुदत संपत आली असल्यामुळे पालकांचे टेन्शन मात्र वाढलेले आहे. 

आज अखेर प्रवेश झालेल्यांची संख्या मागील वर्षापेक्षा कमी आहे. प्रशासन याबाबतीत पालकांना सक्रिय मदत करत नाही अशा तक्रारी वाढत आहेत. या जागा रिक्त राहणार नाहीत याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्यावर शिक्षण विभागाचा वचक नाही त्यामुळे याबाबतीत गटशिक्षणाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.

आम आदमी पार्टीच्या 'आप पालक युनियन' चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले की अनेक शाळा पालकांकडे वेगवेगळ्या कारणाने अतिरिक्त फी रक्कम मागत आहेत.
तिळवनी, हातकणंगले येथील रॉयल इंग्लिश स्कूल, तसेच संजय घोडावत इन्स्टिट्यूट,जयसिंगपूर येथे त्या शाळेच्या नियमित फी मधून केवळ प्रतिपूर्ती रक्कम वजा करून उर्वरित रक्कम पालकांनी भरावी तरच आम्ही प्रवेश देऊ असे सांगितले जात आहे. ही रक्कम ३० ते ६० हजार पर्यंत जाते आहे.

दुसरीकडे मुलुंड पूर्व मधील बॉम्बे प्रेसिडेन्सी स्कूल या शाळेमध्ये नर्सरीला प्रवेश दिला आहे. परंतु सरकारकडून पूर्व प्राथमिक नर्सरीला प्रतिपूर्ती दिली जात नसल्याचे कारण सांगून पालकांकडून पूर्ण पैसे मागितले जात आहेत. ही रक्कम ७५ हजार रुपये आहे. पुणे विभागातील अनेक शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी फी च्या नावाने पैसे मागितले जात आहेत. या खाजगी शाळा मोठ्या ॲक्टिव्हिटी फी नावाने फसवणूक करतात ही भावना वाढीस लागली असून शिक्षणाधिकारी पालकांना सहकार्य करत नाहीत असा अनुभव येत आहे. शासनाची प्रतिपूर्ती रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असल्यामुळे हे प्रकार घडत आहेत असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

किर्दत यांनी म्हटले आहे की तर दुसरीकडे ज्याची मुले आरटीई अंतर्गत शिकत आहेत, त्यांनाही अँक्टिव्हिटी फी नावाने अतिरिक्त रक्कम मागितली जात आहे. हे पैसे ज्यांनी दिले नाहीत त्यांचे रिझल्ट दिले जात नाहीत. पुणे शहरातील पंडितराव आगाशे शाळेत ६००० रुपये दिले तरच रिझल्ट शीट देऊ असे सांगून पालकांना परत पाठवले जात आहे.

माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल

'डीएसके' यांचा ठाम विश्वास; नव्या उमेदीने पुनरागमनाची तयारी

 



पुणे : घराला ‘घरपण’ देणारी माणसं म्हणून ओळख असलेले डी. एस. कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मकतेच्या बळावर त्यांनी कठीण काळानंतर नव्याने उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दीपक सखाराम कुलकर्णी या नावाचा 'डीएसके' असा ब्रॅण्ड पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करणारे, एकेकाळी हजारो कुटुंबांची घराची स्वप्नं पूर्ण करणारे 'डीएसके'  सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे प्रमुख होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे आणि सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या देणी परत करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या उद्योगसमूहाला मोठा धक्का बसला. या संकटामुळे अनेकांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला होता.

या पार्श्वभूमीवर 'डीएसके' यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. “मला कोणाचाही एक रुपया बुडवायचा नाही,” असे सांगत त्यांनी पुन्हा व्यवसायात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या अडचणी तात्पुरत्या असून भविष्यात परिस्थिती निश्चित सुधारेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते  म्हणाले, “माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल.” गेल्या चार दशकांत गुंतवणूकदारांना नफा दिल्याचा उल्लेख करत, एकाच वेळी सर्वांनी पैसे मागितल्यास कोणत्याही उद्योगासाठी ते परत देणे कठीण असते, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

दरम्यान, काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक अडचणी वाढवल्याचाही त्यांनी उल्लेख केला, मात्र त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता नसल्याचे स्पष्ट केले. “मी शून्यातून विश्व उभारले आहे, ते सहज संपणार नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या पुनरागमनाची झलक दिली.

सध्या ते नव्या प्रकल्पांवर काम करत असून पुन्हा एकदा हजारो कोटींच्या व्यवसाय उभारणीची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे उद्योगक्षेत्रात आणि गुंतवणूकदारांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आधी चुकीचे काम करणाऱ्या कंपनीस पुण्यात वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम

पुणे: पुणे शहरातील वृक्षगणनेचे तब्बल ३०  कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय 'सार आय टी रिसोर्सेस प्रा. लिमिटेड' SAAR IT Resources Pvt Ltd या कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करायला लावणाऱ्या या कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट कशासाठी? असा प्रश्न 'सजग नागरिक मंच' चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी स्थायी समितीला उपस्थित केला आहे.


पुणे महापालिका अंतर्गत मिळकतींचे 'जी आय एस मॅपिंग' चे काम २०१६ साली 'सार आय टी रिसोर्सेस प्रा. लिमिटेड' या कंपनीस देण्यात आले. या कंपनीने चुकीच्या पद्धतीने काम करून हजारो पुणेकरांची मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द केली. यातून नागरीकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आणि गेली चार वर्षे या चुका निस्तरताना नागरीक आणि मनपा प्रशासन दोघांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पीटी ३ फाॅर्म भरुन मिळकत करात  दुरुस्ती करण्याचे काम आजही सुरुच आहे. महापालिकेने नेमलेल्या समितीने या कंपनीने केलेल्या  कामाचा छोटा सर्व्हे केला होता आणि या कंपनीने  ८८ टक्के ठिकाणी चुका केल्याचा अहवाल या समितीने दिला होता व  त्याआधारे महापालिकेने सदरहू कंपनीचे बिल , सुरक्षा ठेव व बॅंक गॅरंटी मिळून जवळपास १२ कोटी रुपये जप्त करण्याचा निर्णय घेतला. 

अशा कंपनीला महापालिकेने  पुन्हा कोणतेही काम देणे अपेक्षित नसताना पुणे महापालिकेने प्रशासक राज संपता संपता फेब्रुवारी २०२६ मध्ये या कंपनीला पुणे शहरातील वृक्षगणनेचे तब्बल ३०  कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थायी समितीने अशा सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये सदरहू कंपनीचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन  या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

SAAR IT Resources Pvt Ltd ही २००८ मध्ये स्थापन झालेली, मुंबईस्थित एक अग्रगण्य ITES आणि तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी GIS, सल्लागार सेवा, सॉफ्टवेअर विकास, आउटसोर्सिंग आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (Business Process Management) यांसारख्या सेवा पुरवते.

अंजली चंद्रकांत पाटील यांचा 'गीताव्रती' पदवीने गौरव

 


पुणे: सौ. अंजली पाटील यांना 'गीता परिवार' या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित 'गीताव्रती' ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. श्रीमद्भगवद्गीतेचे शुद्ध उच्चारण, पाठांतर आणि सखोल अर्थाचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात येते.

सौ. अंजली पाटील या स्वतः एक कॉस्ट ऑडिटर असूनही, त्यांनी व्यस्त कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत गीतेचा सखोल अभ्यास केला. 'गीता परिवार' या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्गांच्या माध्यमातून त्यांनी गीतेचे १८ अध्याय पूर्ण केले. केवळ पाठांतर नव्हे, तर गीतेतील कर्मयोग आपल्या आचरणात आणण्यासाठी त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गीता परिवार’ ही संस्था जगभरात गीतेचा प्रचार करत आहे. या संस्थेचा 'गीताव्रती' हा एक सन्माननीय टप्पा असून, जो साधक गीतेच्या शुद्ध पठणात नैपुण्य मिळवतो, त्याला ही पदवी दिली जाते.

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक; मुंबई महानगर पालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आल्याने पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला आहे.


पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शुक्ला (वय ३८) आणि तक्रारदार महिला यांची ओळख विक्रोळीतील बिल्डिंग प्रपोजल विभागात काम करत असताना झाली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख हळूहळू जवळिकीमध्ये बदलली. याच काळात शुक्लाने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींचा दाखला देत पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे सांगितले आणि त्या महिलेवर विश्वास बसवून तिला लग्नाचे आश्वासन दिले.

या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत संबंध ठेवले. मात्र कालांतराने शुक्ला लग्नाचा विषय टाळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवत शुक्लाला अटक केली आहे. सध्या पोलीस त्याची सखोल चौकशी करत असून या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासले जात आहेत. तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आणि पुढे त्यांची पूर्णवेळ सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यावर असे गंभीर आरोप झाल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आय.एल.एस. विधी महाविद्यालयाला बेकायदेशीर शुल्क भोवले

पुणे : प्रसिद्ध आय.एल.एस. विधी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली. संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क ६ टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश देण्यात आले. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशासकीय अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अपारदर्शक पद्धतीने व बेकायदेशीर शुल्क आकारणी करण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण विभागाने सह संचालक (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करून सखोल चौकशी केली. 

या चौकशीअंती सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, संबंधित महाविद्यालयाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०१ (७) च्या तरतुदींचे उल्लंघन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची पूर्वमान्यता न घेता शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२,  व २०२४-२५ दरम्यान विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्क वसूल केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याचिकाकर्त्याकडून १७ विविध शीर्षकांखाली एकूण १,०४,८६३ रुपये इतकी रक्कम बेकायदेशीररीत्या वसूल करण्यात आल्याचे आढळून आले आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयाद्वारे संबंधित महाविद्यालयास सदर रक्कम फी भरल्याच्या दिनांकापासून ६ टक्के व्याजदराने संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेत सल्लागारांचा नाहक सुळसुळाट

 

पुणे: महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञ इंजिनियर असताना सध्या सल्लागारांचा सुळसुळाट झालेला आहे. प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका आहे. सल्लागार संस्थेकडे तज्ज्ञही नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात. 

'आपले पुणे आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेचे 
उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी ही बाब पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

केसकर यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञ इंजिनियर  असताना सल्लागार का नेमले जातात हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी ढकलतो  आहोत.

पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे आणि त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ संपेल, असे संबंधित पत्रात 'आपले पुणे आपला परिसर' ने म्हटले आहे.